नाशिक । भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची यंदाच्या २०२५-२६ च्या हंगामात देखील रणजी ट्रॉफी सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर् मध्ये नाशिकमध्ये पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी सामन्याचा जल्लोष होत आहे. १ ते ४ नोव्हेंबर् २०२५ दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा चार दिवसीय सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे.
या रणजी सामन्या निमित्त नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित संघटनेचे चेअरमन विनोद शहा यांनी माहिती दिली. या रणजी ट्रॉफीच्या सामन्यासाठी बीसीसीआय तर्फे एस डॅनियल मनोहर (हैद्राबाद) हे सामनाधिकारी आहेत. तर पंच म्हणून तन्मय श्रीवास्तव (दिल्ली) व साईधर्शन कुमार (अहमदाबाद) हे जबाबदारी पार पाडतील. नाशिकमध्ये दाखल झालेले त्रयस्थ बीसीसीआयचे खेळपट्टी तज्ञ – क्यूरेटर – टी मोहनन (केरळ) हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निलेश गायकवाड व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे शेखर घोष यांच्यासह खेळपट्टी व मैदानावर मेहनत घेत आहेत.
या निमित्ताने समस्त नाशिककर क्रीडा व क्रिकेट प्रेमींनी ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, जयदेव उनाडकट , चेतन सकारिया या सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या तसेच अंकित बावणे ,जलज सक्सेना ,अर्शिन कुलकर्णी व इतर अनेक आय.पी.एल तारांकित खेळाडूंच्या खेळाचा पुरेपूर आनंद घेण्याचे आवाहन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे शहा यांनी केले.









