नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतेे छगन भुजबळ यांचा आज शपथविधी झाला. भुजबळांच्या मंत्रिमंडळाच्या प्रवेशाबाबत बोलतांना राज्याचे कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया देतांना भुजबळांचे स्वागत केले. अजित दादांनी सर्वसमावेशक मंत्रिमंडळ तयार केले असून, ओबीसी चेहरा असावा अशी भावना त्यांची पूर्वीपासून होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. भुजबळ आणि माझ्यात कोणतेही मतभेत नाहीत असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
राज्याच्या मंत्रीमंडळात नाशिकमधून आमदार अॅड. माणिकराव काकाटे, नरहरी झिरवाळ यांना स्थान देण्यात आले. मात्र, भुजबळांना डावलण्यात आल्याने भुजबळांनीही याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. यावेळी भुजबळांनी ‘जहाँ नही चैना, वहाँ नहीं रहना’ असे वक्तव्य केले होते.
कृषीमंत्रीपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर प्रथमच नाशिकमध्ये आल्यानंतर कोकाटे यांनी भुजबळांवर टिकास्त्र सोडले होते. अजित पवारांवरील टिका सहन केली जाणार नाही असे आव्हान त्यांनी नाव न घेता भुजबळांना दिले होते. त्यामुळे दोघा नेत्यांमध्ये अनेकवेळा शाब्दिक चकमक घडल्या. परंतू भुजबळांच्या मंत्रीमंडळातील समावेशानंतर कोकाटेंनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येते.
कोकाटे म्हणाले, भुजबळ आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. काही लोक उतावीळ आहेत. भुजबळांचे ‘जहाँ नहीं चैन वहाँ नहीं रहना’ हे भाष्य उतावीळपणाचे होते. मात्र त्यांना आता न्याय मिळालाय. ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत. ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतल्याने फायदा होतो, हे माझ्याबरोबरच भुजबळांचाही अनुभव आहे, असे त्यांनी सांगितले.
जरांगे भुजबळांचे मला माहित नाही
भुजबळांच्या शपथविधीनंतर मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टिका केली. याबाबत विचारले असता कोकाटे म्हणाले, जरांगे यांचे मत हे वैयक्तिक आहे. भुजबळ आणि त्यांचे काय चालले आहे, याची मला माहिती नाही. मात्र अजित दादांचे नेतृत्व खंबीर आहे. मी जर त्यांच्या जवळ लवकर गेलो असतो, तर कदाचित मला फायदा झाला असता. असो… ’देर आये, दुरुस्त आये’ हेच खरे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.











