नाशिक । महाराष्ट्रात आयएएस अधिकार्यांच्या बदल्यांचा क्रम सुरूच आहे. नव्या आदेशानुसार सात अधिकार्यांची बदली करण्यात आली आहे. इगतपुरी उपविभागीय अधिकारीपदी डॉ. जी.व्ही.एस पवनदत्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवनदत्त हे गडचिरोली विभागातील देसाईगंज येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

या बदल्यांमध्ये डॉ. अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. संजय कोलते यांना मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालकपद देण्यात आले आहे.
तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागात बदली झाल्यानंतर असंघटीत कामगार विकास आयुक्तपद रिक्त झाले होते. हे पद आता सुशील खोडवेकर यांच्या ताब्यात आले आहे. तसेच, सावन कुमार यांना जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नेमण्यात आले असून नमन गोयल यांना नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद सोपवले आहे.
याशिवाय, डॉ. जी.व्ही.एस. पवनदत्त यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी (नाशिक) तर लघिमा तिवारी यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी (चंद्रपूर) पदावर बदली करण्यात आली आहे.
याआधी, गेल्या आठवड्यात पाच आयएएस अधिकार्यांची बदली झाली होती, ज्यात तुकाराम मुंढे, नितीन पाटील, अभय महाजन, ओंकार पवार आणि आशा अफजल खान पठाण यांचा समावेश होता.










