राज्यात पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील स्थिती

मुंबई । राज्यात 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहील्यास मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प होण्याची आणि लोकल ट्रेन सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

1 जून ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 1 टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटरहून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे.

22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही.

अद्यापही ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकर्‍यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येतआहे.

नाशिकला यलो तर मुंबईला ऑरेंज अर्लट
हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अर्लट जारी केला असून, काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या आठवडयाच्या मध्यापर्यंत पावसासोबत वादळी वारयांचा सामना करावा लागू शकतो. भरतीच्यावेळी किनारी व सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. नाशिकमध्ये पुढील काही तास पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे तर २२ जून पर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

error: Content is protected !!