नवी दिल्ली । नाशिक जिल्ह्याने आपल्या द्राक्षे आणि मनुकांच्या (ग्रेप्स अँड रेझिन्स) उत्पादनासाठी ’एक जिल्हा, एक उत्पादन – 2024’ (ODOP) उपक्रमांतर्गत कृषी क्षेत्रातील ’अ’ श्रेणीतील विशेष उल्लेख पुरस्कार पटकावून मोठा मान मिळवला आहे.
नाशिकच्या द्राक्षांनी केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपली ठसठशीत उपस्थिती सिद्ध केली आहे. उच्च गुणवत्ता, सातत्यपूर्ण उत्पादन आणि निर्यातीतील यशामुळे नाशिकची द्राक्षे आता जागतिक ब्रँड बनली आहेत.
या यशाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाशिकच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेत ही मान्यता दिली आहे.
हा पुरस्कार सोमवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ODOP पुरस्कार समारंभात प्रदान करण्यात आला.
नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, तसेच राज्यमंत्री जितिन प्रसाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नाशिकचा कृषी परंपरेतील ठसा अधिक गडद
नाशिक जिल्ह्याचा हवामान, जलसिंचन आणि शाश्वत शेती पद्धतीमुळे द्राक्ष उत्पादनात नेहमीच अग्रक्रम राहिला आहे. या क्षेत्रातील शेतकरी, निर्यातदार आणि कृषी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नाशिकने हा सन्मान मिळवला आहे.
या पुरस्कारामुळे नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांची मेहनत राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाली असून, येत्या काळात जागतिक बाजारपेठेत अधिक संधी मिळवण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे.
रत्नागिरी – हापूस आंबा (सुवर्णपदक)
रत्नागिरीच्या हापूस आंब्याने आपल्या गोड चव आणि उच्च गुणवत्तेमुळे कृषी क्षेत्रातील ’अ’ श्रेणीतील प्रथम क्रमांक पटकावला. पुरस्कार जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी स्वीकारला. हापूस आंब्याची गोड चव, उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हे यश मिळाले आहे.
नागपूर – संत्री (रौप्यपदक)
नागपूरच्या रसाळ संत्र्यांनी दुसर्या क्रमांकावर स्थान पटकावले. पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी स्वीकारला. नागपूर संत्र्यांनी आपल्या रसाळ चवीने आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्तेने देश-विदेशात ख्याती मिळवली आहे. या यशामुळे नागपूर जिल्ह्याचा कृषी वारसा आणखी समृद्ध झाला आहे.
अमरावती – मंदारिन संत्री (कांस्यपदक)
सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि बागायती क्षेत्रातील योगदानामुळे अमरावतीने तृतीय क्रमांक पटकावला. जिल्हा उद्योग केंद्र प्रमुख नीलेश निकम यांनी पुरस्कार स्वीकारला. संत्रा उत्पादनातील सातत्य, गुणवत्ता आणि बागायती क्षेत्रातील उत्कृष्ट प्रयत्न यामुळे अमरावतीने हे यश संपादन केले.
गैर-कृषी क्षेत्रातील सन्मान:
अकोला – कापूस जिनिंग व प्रेसिंग (विशेष उल्लेख)
अकोल्याच्या औद्योगिक प्रगतीमुळे गैर-कृषी क्षेत्रात विशेष उल्लेखाचा सन्मान मिळाला. पुरस्कार महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी स्वीकारला.
महाराष्ट्राची कामगिरी राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरली
या उपक्रमाचा उद्देश स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन त्यांना राष्ट्रीय आणि जागतिक बाजारात स्थान मिळवून देणे हा आहे. यावर्षी पुरस्कार राज्य, जिल्हा आणि परदेशातील भारतीय दूतावास अशा तीन गटांमध्ये वितरित करण्यात आले. परदेशातील दूतावासांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदवून या उपक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित केले. आंध्र प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह महाराष्ट्राने ‘अ’ श्रेणीतील सुवर्णपदक मिळवत राष्ट्रीय पातळीवर आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे.











