तूर उत्पादक शेतकर्‍यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । राज्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. पीपीएस (प्राईस सपोर्ट स्कीम) अंतर्गत नाफेड व एनसीसीएफ या संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदी मोहिमेला आता 28 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

यापूर्वी तूर खरेदीची अंतिम मुदत 13 मे 2025 होती. मात्र, राज्यातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींकडून आलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे मुदतवाढीची विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ही मागणी मान्य करत खरेदीस 28 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्यात आतापर्यंत 1 लाख 37 हजार 458 शेतकर्‍यांनी तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी 13 मेपर्यंत 69,189 शेतकर्‍यांकडून 1,02,951 मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित नोंदणीकृत शेतकर्‍यांची तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी ही मुदतवाढ उपयुक्त ठरणार आहे.

केंद्र सरकारने 2024-25 या हंगामासाठी राज्यात 2 लाख 97 हजार 430 मेट्रिक टन तूर खरेदीस मान्यता दिली आहे. नाफेड व एनसीसीएफ या नोडल संस्थांच्या माध्यमातून राज्यातील 764 खरेदी केंद्रांवर सध्या तूर खरेदी सुरू असून शेतकर्‍यांना 7,550 रुपये प्रति क्विंटल हमीभाव दिला जात आहे. सध्या बाजारभाव तुलनेत हा दर अधिक असल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होत आहे.

error: Content is protected !!