नाशिक । येत्या महाकुंभमेळ्यात नाशिकमध्ये देश-विदेशातून कोट्यवधी भाविक दाखल होणार आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, अधिकाधिक भाविकांना भक्तीचा लाभ मिळवून देणे आणि गोदावरी तीरावरील अखंड श्रद्धा व भक्तिपरंपरा जपणे, यासाठी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे – घाटाघाटावर दिव्य आरती साखळी उभारण्याचा.
या उपक्रमाची प्राथमिक चाचणी म्हणून आज रामतीर्थ घाटावर विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले. गोदा सेवकांनी उत्स्फूर्त सहभाग देत, प्रत्यक्ष घाटावर आरती करत तयारीचा आढावा घेतला. रामतीर्थ ते थेट तपोवनपर्यंत आरती साखळी विस्तारता येईल, असा विश्वास तरुण सेवकांनी व्यक्त केला.
आरती उपक्रमाचे उद्दिष्ट :
एकाच घाटावर गर्दी होउ नये.
प्रत्येक घाटावर भक्तीमय आणि शिस्तबद्ध वातावरण
श्रद्धेची अखंड ज्योत राखणे आणि धार्मिक शिस्त जपणे
स्वच्छ तीर्थ, सातत्य आरती, कुंभ सुसंस्कृत! या घोषणेनुसार भक्तिपरंपरेचा प्रसार
यांची होती उपस्थिती
या उपक्रमावेळी समितीचे अध्यक्ष जयंतर गायधनी, उपाध्यक्ष कृपादास, सचिव मुकुंद खोचे, युवा प्रमुख चैतन्य गायधनी, तसेच अक्षय शेरताटे, तुषार गुरुम, आकांक्षा नांद्रे, हितेश चंदवाणी, स्वरा क्षेमकल्याणी, अक्षय पवार, प्रथमेश जोशी, धनश्री फाटे व अनेक गोदा सेवक उत्साहाने सहभागी झाले.
भाविकांसाठी सोयी आणि समन्वय
समितीने सांगितले की, स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि घाट व्यवस्थापन समित्यांशी समन्वय साधत पुढील व्यापक आराखडा तयार करण्यात येणार आहे. श्रद्धा, स्वच्छता आणि शिस्तीचा संगम साधत गोदावरी तीरावरील वातावरण भक्तिभावाने भारले जाणार आहे.










