क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो – नाशिकच्या विकासाला नवी दिशा आणि गती : भुजबळ

नाशिक- केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान योजनेअंतर्गत रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठी ही योजना लागू होणार आहेत. क्रेडाईचे हे प्रदर्शन केवळ प्रदर्शन नव्हे तर भविष्यातील नाशिकच्या विकासाची दिशा दाखवणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले . मुंबई, पुण्यानंतर नाशिक हे महाराष्ट्रातील तिसरं डेस्टिनेशन बनल असल्याचे ते म्हणाले.

नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे क्रेडाई नाशिकच्या वतीने आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ चा मंत्री छगन भुजबळ व मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार डॉ.राहुल आहेर, ज्येष्ठ उद्योजक जितेंद्रभाई ठक्कर, क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर, अनिल आहेर, अविनाश शिरोडकर, दीपक चंदे, तुषार संकलेचा, कुणाल पाटील, नरेंद्र कुलकर्णी, उदय घुगे, ऋषिकेश कोते, मनोज खिवंसरा, लक्ष्मण सावजी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,
नाशिकमध्ये होत असलेला हा एक्स्पो महाराष्ट्रातील सर्वात मोठा एक्स्पो आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तसेच हा फक्त एक रिअल इस्टेट प्रदर्शन नाही, तर नाशिकच्या भविष्यासाठीच्या विकासाची दिशा दाखवणारा आणि आपल्या शहराला नवी ओळख देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. नाशिकच्या बांधकाम उद्योजकांनी विश्वासार्हता निर्माण केली आहे. यापुढील काळातही उद्योजकांनी आपण हे नाव कायम ठेवावे असा ज्येष्ठत्वाचा सल्लाही त्यांनी उपस्थित व्यावसायिकांना दिला.

ते म्हणाले की, सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट व्हायअबिलिटी गॅप फंडिंग- व्हीजीएफ निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान योजनेअंतर्गत रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठी देखील ही योजना लागू होणार आहेत. ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रति आसन ३ हजार २४० रुपये दराने व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे. उडान योजनेअंतर्गत ‘रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम’ हा निर्णय नाशिकसाठी लागू करण्याची मागणी आपण केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला भव्य दिव्य उड्डाणपूल उभारला. नाशिक पुणे, नाशिक मुंबई रस्त्याचे काम मार्गी लावले. नाशिकच्या विकासाला अधिक गती मिळण्यासाठी आपण नाशिकमध्ये विमानतळ निर्माण केले. या विमानतळाचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला हिरवा कंदील दिला आहे. त्याचबरोबर ३४० कोटी रुपये खर्च करून नवीन धावपट्टी निर्माण केली जाणार आहे.

नाशिक शहरातील भविष्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी किकवी प्रकल्प मंजूर करण्यात आला असून काम सुरू करण्यात आले आहे. नाशिक शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने इनर आणि आउटर रिंगरोड विकसित करण्यात आले आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्याचे रुंदीकरण व इतर आवश्यक विकास करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आपल्याकडे उत्कृष्ट हवामान, भौगोलिक उपलब्धता, शैक्षणिक व आरोग्य सुविधा, उद्योग-व्यवसायासाठी पोषक वातावरण आणि आता जलदगतीने होणारी पायाभूत सुविधा विकासाची कामे या सर्व गोष्टींमुळे नाशिकमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध आहे. आपल्याला केवळ विकास करायचा नाही, तर तो शाश्वत आणि पर्यावरणपूरक असावा लागेल. नाशिकच्या नैसर्गिक सौंदर्याचा, स्वच्छ हवेचा आणि हरित परिसराचा जप करत विकास करणे ही आपली जबाबदारी आहे. ऊर्जा-बचत करणारी इमारती, सौरऊर्जा वापर, पावसाचे पाणी साठवणूक, कचरा व्यवस्थापन या बाबींवर आपल्याला भर द्यावा लागेल असे त्यांनी सांगितले.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नाशिक शहराला ऐतिहासिक वारसा आहे. या शहराच्या विकासात क्रेडाई संस्थेचा वाटा मोलाचा आहे. शहराचा विकास अतिशय सुंदर व्हावा यासाठी बांधकाम क्षेत्र अतिशय महत्वाचे आहे. क्रेडाईन सामाजिक सलोखा ठेवून अनेक उपक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे. नाशिकच्या विकासासाठी रिंगरोड अतिशय महत्वाचे असून सहा हजार कोटी रुपये खर्च करून ही रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार सीमा हिरे, क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऋषीकेश कोते यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण मतकरी यांनी केले.

error: Content is protected !!